राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले
मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आज रेल्वे मंत्रालयाने देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे याची ग्वाही दिली.
अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे, रेल्वे , खाजगी आणि एस टी बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा, करणारी केंद्रे सुरुच राहतील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वंयशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.