
मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, बचत गटांचे स्टॉल, प्रश्नमंजुषा स्पर्धा, बक्षीस वितरण
केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार, सोलापूर व जिल्हा आर्थिक विकास महामंडळ यांचा विशेष उपक्रम
अक्कलकोट, दि. ३१ : नीति आयोग, भारत सरकार कडून ४ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी देशाच्या दुर्गम भागात असलेल्या ११२ आकांक्षी जिल्हा व ५०० आकांक्षी तालुक्यामध्ये ‘संपूर्णता अभियान’ ही तीन महिन्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सोलपूर जिल्ह्यातील सांगोला व अक्कलकोट तालुक्याचा समावेश असल्याने केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, सोलापूर, जिल्हा आर्थिक विकास महामंडळ आणि श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी कांतामाती श्री विजयसिंह राजे भोसले मंगल कार्यालय, मैंदर्गी रोड, अक्कलकोट येथे सकाळी १२ ते ४ यावेळेत संपूर्णता अभियाना वर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
यामध्ये महिलांसाठी पोषण आहार विषयी मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, बचत गटांचे स्टॉल, प्रश्नमंजुषा स्पर्धा, बक्षीस वितरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या दुर्गम भागात असलेल्या ११२ आकांक्षी जिल्हा व ५०० आकांक्षी तालुक्यातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर, पूरक पोषण आहार विषयी गर्भवती महिलांना मार्गदर्शन, बाळांचे संपूर्ण लसीकरण करणे, मृदा नमुना संकलन करून मृदा आरोग्य पत्रिकाचे वाटप करणे आणि महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आदी उपक्रमांचे या अभियानात समाविष्ठ करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे.