अजित पवार म्हणाले “जे झालं ते झालं”
मुंबई: आज राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपसोबत गेलेले आणि पुनः घरवापसी केलेले अजित पवार यांनीही उपस्थित आमदारांना संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले, “जे झालं ते झालं. ते संपलंय आता. आता नवीन सुरुवात करायची आहे. पक्षासाठी काम करायचं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना मंत्रीपदाबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारंच निर्णय घेतील.
गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि यानंतरचे दोन दिवस संबंध देशाने महाराजकीय नाट्य पाहिले. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदावरून गच्छंती करण्यात आली. यानंतर सारे नाट्य पालटले व काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकूण या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना मंत्रिपद मिळते का ते पाहणे लक्षणीय ठरेल.