ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप… असा असणार शेवट
झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या मालिकेच्या शेवटी गुरुनाथ आणि राधिका यांच्या नात्यातील दुरावा कमी होणार असून शनाया त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. गुरुनाथला आपली चूक कळल्यामुळे तो राधिकाची माफी मागणार आहे आणि राधिका देखील मोठ्या मनाने त्याला माफ करून ते दोघे नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ताबा घेण्यास यशस्वी ठरल्या आहेत. शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. शनाया ही व्यक्तिरेखा या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनीलने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र या मालिकेतून तिने काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली. या मालिकेत आता शनायाची भूमिका इशा केसकर साकारत आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकीच पसंती देत आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे.