वसईकरांनो तुम्ही कुणाचेही गुलाम नाही – उद्धव ठाकरे
पालघर: कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यास सुरुवात झाली आहे. वसईच्या बापाणे फाट्यावर उद्धव ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीसह जंगी स्वागत करण्यात आले.
वसईकरांनो तुम्ही कुणाचेही गुलाम नाही. तुमच्यावर कोणी दादागिरी करत असेल तर या गल्लीबोळातल्या गुंडांची मुजोरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिले.
यापूर्वी या मतदारसंघात झालेल्या निवडणूकीत आम्ही वेगवेगळ्या स्टेजवर प्रचार करत होतो. संपूर्ण ताकदीने मैदानात उतरलो होतो, पण नंतरचा एकूणच कालखंड पाहिल्यावर असं ठरवलं कि एकत्र येण गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा नव्या ताकतीने एकत्र आलो आहोत, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
विरोधकांनी आमच्या मैत्रीत पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांशी भांडत होते आणि याचाच फायदा विरोधक घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचा हा डाव आम्ही एकत्र येऊन हाणून पाडला आहे. त्यामुळे आता माघार नाही. लढायचं ते हिंदुत्वासाठी, असे उद्धव ठाकरे यांनी वसईकरांना सांगितले.