पश्चिम रेल्वेला आज १५२ वर्षे पूर्ण झाली, वाचा त्याविषयीची रंजक माहिती
देशातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावल्यानंतर १४ वर्षांनी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वेगाडी धावली. १२ एप्रिल, १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि परत तीच गाडी सायंकाळी ५.३० वाजता परतीचा प्रवास करायची.
या ट्रेनमध्ये आजच्या लोकल प्रमाणे महिलांसाठी वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याशिवाय स्पेशल एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रथम दर्जाचे तिकीट ७ पैसे, द्वितीय ३ पैसे आणि तृतीय १६ आणे एवढे होते. या रेल्वेगाडीसाठी १८६९ पासून प्रथम, द्वितीय, तृतीय दर्जाची तिकिटे मिळत. एक महिना आणि तीन महिन्याची तिकिटे म्हणजे पास मिळू लागले.
त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण चर्चगेट ते विरार यामध्ये येणारी स्थानके कमी होती. त्यावेळी ही ट्रेन नीअल म्हणजे आताच नालासोपारा, बसिन म्हणजे वसई, पंजो म्हणजे पाणजू, बेरेव्ला म्हणजे बोरिवली, पहाडी म्हणजे गोरेगाव, अंदारू म्हणजे अंधेरी, सांताक्रुझ, बंडोरा म्हणजे वांद्रे, माहीम, दादुरे म्हणजे दादर आणि ग्रँट रोड इत्यादी स्थानकांवर गाडी थांबत होती.