प्रचारासाठी लष्करी कारवाईचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची राष्ट्रपतींकडे तक्रार
नवी दिल्ली: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सैन्य दलाच्या नावाने मते मागण्यात येत असल्याबाबत माजी सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना १५६ माजी सैनिकांतर्फे पत्र लिहून याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या पत्रामध्ये १५६ माजी सैनिकांनी सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांना देऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.
या पत्रामध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या सह्या आहे. दीपक कपूर यांच्यासह माजी जनरल एस.एफ. रोड्रिग्स, माजी जनरल शंकर राय चौधरी, माजी जनरल दीपक कपूर आणि माजी पूर्व वायुसेना प्रमुख एनसी सूरी यांचादेखील समावेश या पत्रात आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने सैन्याच्या कामगिरीवरुन मत मागण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या साहसाचा, लष्करी कारवायांचा आधार घेत मते मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. सैनिकांचा गणेवश घालून मते मागितली जात आहे याबद्दल या माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि हेच या अधिकाऱ्यांना खटकले आहे, त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.