शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वेभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.
अकरावी महाविद्यालय प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु आँनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.