आता कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या ९९ देशांतून भारतात येणार्या नागरिकांना विलगीकरणातून सूट
मुंबई, दि.१६: परदेशातून भारतात येणाऱ्या, पण कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या, ९९ देशांमधल्या नागरिकांना आता भारतात आल्यानंतर विलगीकरणात राहावं लागणार नाही. याबाबतची परवानगी केंद्र सरकारनं नुकतीच दिली आहे.
मात्र त्यांना इतर कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. या प्रवाशांना, त्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र, एअर सुविधा पोर्टलवर द्यावं लागणार आहे, यासोबतच ७२ तासांपेक्षा अधिक जुना नसलेला कोरोना आर.टी.पी.सी.आर. चाचणी अहवालही द्यावा लागणार आहे.
अशा प्रवाशांनी भारतात आल्यावर १४ दिवस आपल्या आरोग्यविषयक स्थितीगतीची देखरेख करणं अपेक्षित असणार आहे. या ९९ देशांपैकी काही देशांसोबत भारताने राष्ट्रीय स्तरावर तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लस दिलेल्या लसींना परस्पर सहमतीनं स्विकारावं याबाबतचा करार केला आहे.