गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिले निवेदन
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करावी. उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदार बारणे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने १६ मे १९९२ रोजी अध्यादेश काढून रायगड जिल्ह्यातील बोरी-पाखाडी, केगाव, म्हातवली या तीन गावातील महसुली हद्दीतील आणि उरण शहरातील सुमारे २७१ हेक्टर क्षेत्रातील शेती, बिनशेती जमीन उरण-करंजा येथील नौदल शस्त्रासागर डेपोसाठी सेफ्टी झोन आरक्षण जाहीर केले आहे. या सेफ्टी झोन परिसरात सुमारे ४० हजाराच्या आसपास रहिवासी वास्तव्यास आहेत.
राज्य सरकारने १४ ऑगस्ट २०१९, १५ जानेवारी २०२१ रोजी सेफ्टी झोन रद्द करण्यासाठी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरीसाठी हा विषय खात्याकडे प्रलंबित आहे. त्यावर कारवाई करत उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे. या मागणीमुळे सेफ्टी झोन परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. लवकरच हा प्रश्न केंद्र शासनाने सोडवावी अशी मागणी येथील जनता अनेक वर्षांपासून करीत आहे.