वनसंपत्तीचे वणव्यापासून संरक्षणाकरिता वनविभागासाठी स्वतंत्र अग्निशमन दलाची स्थापना करण्याची मागणी
उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील वनांना सातत्याने लागणाऱ्या आगी हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी परिक्षेत्र वनअधिकारी शशांक कदम (RFO) आणि उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वणव्यापासून वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागासाठी अग्निशमन दलाची स्थापना करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली. तर अलिबाग उपवनसंरक्षक (DYCF) यांनाही एक प्रत किरण मढवी यांनी पाठवली आहे. वणव्यामुळे विविध वृक्षसंपदा, रानभाज्या, नव्याने उगवलेली जंगली रोपे, विविध औषधी वनस्पती ह्या वणव्यामुळे जळुन राख होतात. शिवाय वन्यजीव, कीटक, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिल्ले, तसेच तृणभक्षी वन्यजीव, सरपटणारे जीवांचे नाहक बळी जात असल्याने येथील जैवविविधता हळू हळू संपुष्टात येत असल्यामुळे उरण तालुक्यात अस्तित्वात असलेल्या वनसंपत्तीचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती बरोबरच आवश्यक ठिकाणी जाळरेषा काढणे, वेळोवेळी सुकलेला पाला-पाचोळा वेचणे अशा अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मात्र तरीही लागलेला वणवा विझविताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांची आणि पर्यावरण प्रेमींची होणारी दमछाक थांबविण्यासाठी आणि आगीला तात्काळ नियंत्रणात आणण्याकरिता वनपरिक्षेत्रात अत्याधुनिक अग्निशमन बंब, उपयुक्त स्मार्ट उपकरणे आणि आग नियंत्रण पथक असलेली सुसज्ज व अद्यावत साधनसामुग्री असणे गरजेचे आहे. उरण तालुका वनविभागासाठी वनपरिक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर अग्निशमन दलाची स्थापना करण्याची नाविन्यपूर्ण मागणी यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी विविध शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करून केली आहे. उरण तालुक्यातील वन विभागासाठी स्वतंत्र अशी अग्निशामक यंत्रणा असेल तर येथील निसर्गाचे, पर्यावरणाचे खूप मोठ्या प्रमाणात रक्षण होणार आहे. पशु-पक्षी-प्राणी यांचेही अस्तित्व अबाधित राहील त्यामुळे किरण मढवींच्या या निर्णयाचे विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केले असून अशा प्रकारची अग्नीशामक यंत्रणा उरण वनविभागासाठी गरजेचे असल्याचे मत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
