खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे़ – उद्धव ठाकरे
नागपूर : खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे़. शिवसेना भाजपाची युती ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी झाली आहे़. भगव्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शिवसेना-भाजप स्नेहमेळाव्यात केले. शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला देशप्रेम शिकवू नये, असा टोला हाणत त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवा असे आवाहनही केले़. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त करीत ठाकरे यांनी युतीच्या निवडणूक प्रचाराचा, राज्याच्या उपराजधानीत शंखनाद केला. आम्ही मतदारसंघ आणि माणसही जिंकतो, असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेना भाजपा युतीच्या स्नेहमेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते व विदर्भाचे समन्वयक दीपक सावंत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती यांच्यासह भाजपा शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी आमदार, खासदार उपस्थित होते़.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात कामे झाली. काही उणीवा होत्या, त्यासंदर्भात आम्ही आवाज उठविला त्यावर सरकारने विचार केला. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही युती केली शिवाय काही लोक पंतप्रधान मोदींवर टीका करतात त्यांना मोदी परवडत नाहीत, अशांनी मग दुसरा प्रकाश दाखवावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. आम्हीही हृदयापासूनच युतीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आम्ही खरं प्रेम करणारे लोक आहोत, कार्यकर्त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता एकदिलाने कामाला लागावे.
सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.