पवनराजेंच्या खुन्यालाही फासावर लटकवायचेय – उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबाद(धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचंड जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
धाराशिव तालुक्यातील शेतकरी दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आम्हाला दुःख आहे. ढवळे यांच्या आत्महत्येची लवकरच चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याला फासावर लटकवू. ढवळे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि पवनराजेंचा खून कोणी केला? दिलीप ढवळेच्या गुन्हेगारासोबत पवनराजेंच्या खुन्यालाही फासावर लटकवायचेय आहे, त्यासाठी ओमराजेंना साहाय्य करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
धाराशिव तालुक्यातील शिवजलक्रांती संपुर्ण जिल्ह्यात झाली पाहिजे. यासाठी शिवसेना भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. शिवसेना भाजप युती करताना शिवछत्रपतींची प्रेरणा घेत आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. विरोधकांच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा नाही, हे विसरुन चालणार नाही. विरोधक जवानांचे पैसै खाऊन निवडणूक लढवत आहेत, आम्ही युती केलीय ती देव, देश आणि धर्मासाठी! लाथा खाऊनही तुम्ही काँग्रेससोबत का गेलात ते आधी सांगा.. आणि तोंडाला काळे फासून हिमालयात जाणार होता त्याचे काय झाले? त्यामुळे आता तुम्हीच ठरवा कोणाला सत्तेत आणायचे, असा सवाल उद्धव यांनी उपस्थितांना केला.
जवाहरलाल नेहरूंनी सावरकरांसारखा सश्रम कारावास भोगला असेल तर मी नेहरूंना वीर जवाहरलाल नेहरू म्हणायलाही तयार आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सत्तेत असलो तरीही तुमची साथ कधीच सोडणार नाही, सत्तेसाठी लाचार होणार नाही असेही वचन तुम्हाला देतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.