Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी

आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी

आदिवासी उपयोजनेचा निधीचा उपयोगासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश

मुंबई : जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये प्रस्तावित निधी खर्च करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने प्राधान्यक्रम ठरवावा. तसेच रस्ते, सौर ऊर्जा या कामांबरोबरच आदिवासी पाड्यांवरील तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रम, आदिवासी समाजाला लागणारे दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करणे अशा कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी येथे दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेतील आदिवासी उपयोजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक ॲड. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

ॲड. पाडवी म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनेत प्रस्तावित करण्यात आलेल्या निधीचा वापर हा आदिवासी भागाच्या विकासासाठीच व्हावा. तसेच गेल्या वर्षीचा कुठलाही निधी परत जाऊ नये, यासाठी नियोजन करावे. आवश्यक तेथे अमृत आहार योजनेसाठी पुरेसा निधी देण्यात येईल. आदिवासी भागातील महिलांचे बचत गट तयार करून स्वयंरोजगारावर भर देण्यात यावा.

आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आदिवासी उपयोजनेसाठी मान्य केलेला निधी पूर्णपणे देण्यात येतो. त्यामुळे हा निधी परत जाऊ नये, याची काळजी घेण्यात यावी. तसेच आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या योजनेतील राज्य शासनाचा हिस्सा हा आता जिल्हास्तराऐवजी राज्य स्तरावरून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला पुरेसा निधी मिळणार आहे.

यावेळी श्री. वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यासाठी निधी वाढवून द्यावा तसेच पडकई योजनेचा निधी राज्यस्तरावरूनच वितरित करण्याची मागणी केली.

पालघरचे पालकमंत्री भुसे यांनीही पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळा, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र आदींना पुरेसा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सर्वश्री अतुल बेनके, महेंद्र थोरवे, रविशेठ पाटील, ठाण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, रायगडच्या जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी आदी यावेळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *