गावात पिण्याच्या पाण्याची नियमित व योग्य पद्धतीने पुरवठा करण्याची मागणी
उरण, दि.८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुका हा मावळ लोकसभा मतदारसंघात येत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेतले होते. गावांना मूलभूत सुविधा पुरवून गावे, खेडी स्वयंपूर्ण बनविणे हा त्या मागचा उद्देश होता. या उद्देशाला अनुसरून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत दत्तक घेतले. गाव दत्तक घेऊनही मात्र गावात पाणी समस्या सारख्या मूलभूत सुविधांची वानवा असल्याबाबतची बाब आता पुढे आली आहे.
उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत काही महिन्यांपासून पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. नळाला पाणी एक दिवसा आड येत आहे आणि पाणी आले तरी मध्येच बंद पडत आहे. थोड्याच वेळात पाणी येणे बंद होणे ही समस्या सबंध गावात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप मोठे हाल होत आहेत. खोपटे (बांधपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करावा व पाणी प्रश्न त्वरित सोडवावे अशी मागणी पूर्व विभाग मित्र परिवाराचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी बांधपाडा(खोपटे) ग्रामपंचायत सरपंच विशाखा ठाकूर, ग्राम विकास अधिकारी दिलीप तुरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट असून पाण्याची मोठी टाकी विजे अभावी भरली जात नाही असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येते. असे असेल तर ग्रामपंचायत कडून किंवा गावात चार पाच मोठ्या कंपन्या आहेत त्यांची मदत घेऊन २५ KVA चा जनरेटर लावावा. जेणेकरून पाण्याची टाकीही नियमित भरेल आणि पुरेसा पाणी साठा निर्माण होईल. एका जनरेटर ची किंमत तीन ते चार लाख एवढी आहे. श्रीमंत असलेल्या बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत साठी ही किंमत काही मोठी नाही. ग्रामस्थांच्या दृष्टीने अति महत्वाच्या असलेल्या या पाणी-प्रश्नाकडे ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे व सरपंच विशाखा ठाकूर या दोघांनाही यात लक्ष घालून पाणी प्रश्न सोडावे असे मत निवेदनाद्वारे गोरख ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.