Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यास मान्यता” – अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी

“‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यास मान्यता” – अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी

पुणे, दि. २१: संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास आदीसाठी ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

राज्याचे उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र ‘श्री अन्न (मिलेट्स) अभियान’ सुरु करणे आणि त्यासाठी २०० कोटी रुपये तरतूद करण्याचे नमूद करण्यात आले होते. श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मुल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अंतर्भाव आहे. सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम, उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व जनमानसापर्यंत पोहचणे व या तृणधान्यांचा आहारातील वापर वाढवण्यासाठी राज्यस्तरीय कृषि परिषदा, जिल्हास्तरीय कृषि महोत्सव, मिलेट दौड (रन/वॉक फॉर मिलेट), पाक कला, कृती स्पर्धा, आहारतज्ज्ञाची व्याख्याने आदींचे आयोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत ११० कोटी रुपये

पौष्टीक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धी, पीक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणीत बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मुलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषि औजारांचे वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन, जिल्हास्तरीय कार्यशाळांद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढ व आहारातील वापर वाढ यासाठी प्रचार व प्रसिद्धी आदी उपक्रम राबविण्याकरीता ११० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘आत्मा’ अंतर्गत ५ कोटी रुपये

आत्मा योजनेअंतर्गत तृणधान्यांचे बियाणे मिनीकिट उपलब्ध करणे व क्षेत्र विस्तार करणे, पिक प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे, माहिती पत्रके, भित्ती पत्रके, प्रसिद्धी पत्रके आदी माध्यमातून प्रचार प्रसिद्धी, विविध स्तरावर पाक कला, कृती स्पर्धा, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धा इत्यादींचे आयोजन, समाज माध्यमे व प्रसार माध्यमे यांचा कार्यक्षम वापर करून प्रचार प्रसिद्धी यासाठी रुपये ५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ५ कोटी रुपये

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांपैकी ज्वारी आणि बाजरी ही पौष्टीक तृणधान्य घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये या पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढवणे व उत्पादन खर्च कमी करणे, मूल्यसाखळी बळकट करण्यास सहाय्य करणे, हवामानातील बदल आणि पावसाचा लहरीपणा या बाबींच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, ग्राम कृषी संजीवनी सदस्यांसाठी विशेष कार्यशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतीशाळा, पौष्टीक तृणधान्य उत्पादकांसाठी लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन इत्यादी विषयावर प्रशिक्षण, कार्यशाळा,अभ्यासदौरे,तालुका निहाय कृषी हवामान सल्ला सेवा, हवामान अनुकूल वाणांच्या बियाण्याचे उत्पादन, उत्पादित मालाच्या मुल्यवृध्दी साठी शेतकरी उत्पादक,महिला गटांना अर्थसहाय्य, उत्पादीत मालाची साठवणूक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी गोदाम उभारणीसाठी अर्थसहाय्य इत्यादीसाठी रुपये ५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना तसेच एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्याकरीता पौष्टीक तृणधान्य आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश, लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुविधा इत्यादीसाठी रुपये ५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची स्थापना
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पौष्टीक तृणधान्य प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तृणधान्यांच्या मूल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमाचे आयोजन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी. ब्रॅडिग, विपणनच्या सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था, हैद्राबाद या संस्थेसोबत सामंज्यस करार करुन सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ३० कोटी रूपये निधी खर्च करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत शेतकरी शास्त्रज्ञ मंचातील सदस्यांना पौष्टिक तृणधान्यविषयी मार्गदर्शन, ज्वारी, बाजरी व नाचणी लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे आयोजन, तृणधान्य उत्पादकांची पिक स्पर्धा आयोजन, पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन, आकाशवाणी, प्रसिद्धीमाध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *