शिवसेना भडकली म्हणाली : “हिम्मत असेल तर या अंगावर! आम्ही तयार आहोत”
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगद बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनीच भाजपने शिवसेना एनडीए चा घटक नसेल अशी घोषणा केली व त्यांची विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केल्याचेही स्पष्ट केले. भाजपच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आज आपल्या सामना या मुखपत्राच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींवर तोफांचा घणाघात केला आहे. शिवसेना म्हणते की, “सारेजण विरोधात गेले असताना ‘मोदी’ यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस ‘एनडीए’तून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, कड्याकपाऱ्यांत फक्त एकच गर्जना घुमेल, ‘शिवसेना झिंदाबाद!’ हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत”
एकूणच भाजपने शिवसेनेला दुखावल्यामुळे शिवसेना आधीपेक्षा जास्त आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. याचा ट्रेलर काल लोकसभेत पाहायला मिळाला. शिवसेनेने महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसदेत घोषणाबाजी केली व संसदेबाहेरही सरकारचा निषेध केला.
सविस्तर अग्रलेख पुढीलप्रमाणे
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील भाजपा धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? ‘प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई’ तशी ही अतिघाई या मंडळींना नडल्याशिवाय राहणार नाही. नव्हे ती नडलीच आहे. दिल्लीच्या मोदी मंत्रिमंडळातील कुणी एक प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले की, काँग्रेस व राष्ट्रवादीशी शिवसेनेचे संबंध जुळल्यामुळे ‘एनडीए’तून बाहेर काढले आहे व त्यांच्या खासदारांच्या संसदेतील जागा बदलून विरोधी पक्षांच्या बाकांवर त्यांना बसवण्यात आले आहे. ज्या वाकडतोंड्याने ही घोषणा केली त्याला शिवसेनेचे मर्म आणि ‘एनडीए’चे कर्म–धर्म माहीत नाही. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्या आहेत. ‘एनडीए’च्या जन्मकळा व बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते आणि हिंदुत्व, राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात कुणी विचारीत नव्हते, तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल ओतण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेस बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी तर इतिहास समजून घेतला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, पंजाबचे बादल अशा दिग्गजांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाया घातला तेव्हा आजचे ‘दिल्लीश्वर’ गोधडीत रांगतसुद्धा नसावेत. काहींचा तर जन्मही झाला नसावा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठका होत व महत्त्वाचे निर्णय साधकबाधक चर्चा करून घेतले जात होते. श्री. जॉर्ज फर्नांडिस हे ‘एनडीए’चे निमंत्रक होते व आडवाणी हे प्रमुख होते. आज ‘एनडीए’चे प्रमुख किंवा निमंत्रक कोण आहेत याचे उत्तर मिळेल काय? आता शिवसेनेस बाहेर काढण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत आणि कोणत्या आधारावर घेतला? हे सर्व प्रकरण
इतक्या विकोपास
का गेले? यावर ‘एनडीए’च्या घटक पक्षांची बैठक बोलावून चर्चा घडवून हा निर्णय झाला आहे काय? कुणी तरी एक वाकडतोंड्या उपटसुंभ उठतो व शिवसेनेस ‘एनडीए’तून बाहेर काढण्याची घोषणा करतो. बरे झाले, या कृतीतून तुमच्या विचारांचे गजकर्ण अखेर आज बाहेर पडले. गेले काही दिवस खोटेपणाची खाजवाखाजव सुरू होती. त्यामागचा खरा आजार आता बाहेर पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनाचा मुहूर्त या गजकर्ण्यांना सापडला. सारा देश बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ज्यांनी ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हे शब्द आम्ही आज येथे जाणीवपूर्वक वापरत आहोत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा तंबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही या निमित्ताने पंगा घेणाऱ्यांना देत आहोत. महाराष्ट्र एकतर उठत नाही, उठला की बसत नाही. पैसा व सत्तेचा माज शिवरायांच्या मातीत चालत नाही याचा अनुभव कालच्या विधानसभा निवडणुकीत आलाच आहे. हिंदुस्थानातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक म्हटला जाणारा आक्रमक मोहम्मद घोरी आणि त्या वेळचे पराक्रमी हिंदू राजे पृथ्वीराज चौहान यांच्यात काही इतिहासकारांच्या मते सुमारे 18 छोटी–मोठी युद्धे झाली. त्यातील 17 युद्धांमध्ये घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येक वेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. पुढे हीच चूक त्यांना महागात पडली. शेवटच्या युद्धात मोठी तयारी करून आलेल्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यांनी वेळोवेळी दिलेली
जीवदाने विसरून
घोरीने कृतघ्नपणा केला. पृथ्वीराज चौहान यांना अटक केली. त्यांचे हालहाल केले. महाराष्ट्रातही आम्ही अशा विश्वासघातकी आणि कृतघ्न प्रवृत्तीला अनेकदा जीवदान दिले. आज हीच प्रवृत्ती शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात, शिवरायांचा महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही. भारतीय जनता पक्षाचा बोभाटा आहे की शिवसेनेने काँग्रेसबरोबर संबंध जोडले आहेत. आम्ही विचारतो, असे काही घडताना दिसत असेल तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलवून याबाबत शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही? म्हणजे चोर कोण व ढोंगी कोण याची शहानिशा समोर आली असती. पण शिवसेनेच्या प्रखर माऱ्यापुढे तुमचे ढोंग टिकले तर ना! कश्मीरात राष्ट्रद्रोही तसेच पाकडय़ांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तीशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपने ‘एनडीए’ची परवानगी घेतली होती काय? पाक पुरस्कर्त्यांना ‘एनडीए’च्या बैठकीत मानाच्या खुर्च्या देताना परवानगी घेतली होती काय? नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्या, मोदी यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या नितीश कुमारांच्या कमरेवर पुन्हा ‘एनडीए’चे लंगोट बांधताना तुम्ही आमची परवानगी घेतली होती काय? पण सारे जण विरोधात गेले असताना ‘मोदी’ यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस ‘एनडीए’तून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, कड्याकपाऱ्यांत फक्त एकच गर्जना घुमेल, ‘शिवसेना झिंदाबाद!’ हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत!!
