भाजप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबाबाबत केली चर्चा
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या शिष्टामंडळाने आज राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार उपस्थित होते.
ही भेट झाल्यानंतर माध्यमांशी वार्तालाप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील सत्तापेचावर कायद्याच्या अंगाने चर्चा केली तसेच राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब लागत आहे. पण राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर पक्ष नेतृत्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल.” आज अशी अटकळ बांधली जात होती की भाजप राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करेल. पण आजही भाजपने शिवसेनेला दिलेला अल्टीमेटम गेल्या वेळेसारखा पुढे ढकलला आहे. यामुळे भाजपची प्रतिमा हतबल पक्ष अशी झाली आहे.