स्वातंत्र्यदिनी शरण संकुलने केला पत्रकारांचा गौरव
नवी मुंबई, दि.१६: काल दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई व परिसरात लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी या संघटनेने कोपरखैरणे येथील संघटनेच्या कार्यालयात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा सत्कार, गौरव करून आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला.
सर्वधर्मसमभावी, मानवतावादी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात शरण संकुलचे सहसचिव आनंद गवी यांनी पत्रकार, सोशल मीडिया, टी व्ही चॅनेल, वृत्तपत्रे यांचे आजच्या काळात खूपच अनन्य साधारण महत्व असल्याचे प्रतिपादन केले. कोणत्याही कार्यक्रमाची प्रसिद्धी ही मीडियाच्या माध्यमातूनच होते. पत्रकार हा मीडियातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचे महत्व अधिक आहे असे आनंद गवी यांनी सांगितले.
तर संस्थेचे चेअरमन जी. बी. रामलिंगय्या यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असून दररोजच्या दैनंदिन घटना आपणास पत्रकार, मीडियाच्या माध्यमातून जनतेला, नागरिकांना समजतात. त्यामुळे पत्रकारांचे, मीडियाचे काम खूपच महत्वाचे, उल्लेखनीय आहे. देशाच्या विकासात पत्रकारांचेही महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले.
यावेळी उरण तालुक्यातील पत्रकार विठ्ठल ममताबादे (प्रिंट मीडिया), आवाज टुडे चॅनेल (इलेक्ट्रॉनिक मीडिया)चे नवी मुंबई प्रतिनिधी प्रिया भुजबळ, कॅमेरामन सुमित रेनोसे यांचा सन्मानचिन्ह, शाल, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकं, कपाळावर धारण करण्यात येणारे भस्म देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष जी. बी. रामलिंगय्या, विश्वस्त एन. एम. किरसावळगी, खजिनदार विठोबा मेत्री, सहखजिनदार सुनील पाटील, सहसचिव आनंद सोमेश्वर गवी, कमिटी सदस्य प्रकाश जंगम, प्रकाश अवरनळ्ळी, वैजिनाथ आग्रे, विरेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीने पत्रकारांचा सत्कार करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. पत्रकार, मीडिया प्रती दाखविलेल्या सहानुभूती, आदराबद्दल पत्रकार विठ्ठल ममताबादे, पत्रकार प्रिया भुजबळ, कॅमेरामेन सुमित रेनोसे यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले.