उद्धव ठाकरे एकदा तरी मैदानात या : शरद पवारांनी दिला चॅलेंज
पुणे: २०२० मध्ये मला ८०वे वर्ष लागाणार आहे. मी माझ्या आयुष्यात विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका १४ वेळा लढविल्या; एकदाही पराभव झाला नाही. नव्या चेहऱ्याला, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे तरच ते राजकारणात उतरतील त्यासाठी आपण थांबलं पाहिजे. काही लोकांना गैरसमज झाला आहे त्यांना असं वाटायला लागले आहे की मी मैदान सोडून पळ काढतोय. त्यांना माझी विनंती आहे, एकदा तरी सोमारासमोर मैदानात या,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिरूर लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सभा काल मंचर येथे झाली. या वेळी शरद पवार यांनी युतीवर टीका केली.
ज्यांनी कधीही आयुष्यात कुस्तीचे मैदान बघितले नाही, कुस्ती खेळली नाही. त्यांनी आम्हाला मैदानात बोलावू नये. मैदान बघायचे असेल तर कधीही या. आमचे बारके पैलवानही कुस्ती खेळतील तुमच्यासोबत तिथे माझी गरज तुम्हाला भासणार नाही. त्यामुळे मैदानातून पळून जाण्याच्या गोष्टी ठाकरेंनी आम्हाला सांगू नयेत. तुमच्या बापजाद्यांनी सारे काही तुमच्यासाठी उभे करून ठेवले आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी ठाकरेंवर हल्ला केला.
यापूर्वी राज्याची सत्ता तुमच्याकडे होती. तेव्हा का नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली? सहकारी कारखानदारी, दुधाचा प्रश्न का नाही सोडवला? त्यामुळे अशा व्यक्तींच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची नाही, असा निर्णय मतदारांनी घेतला पाहिजे,’ असे आवाहनही पवार यांनी केले.