दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकला देऊ नका; शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी
पाटण: महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळायला लागाल आहे. पिकांव्यतिरिक्त पिण्याच्या, रोजच्या वापराच्या पाण्यासाठीही लोकांना वणवण करावी लागत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील आधीच कमी असलेला पाण्याचा साठा आणखीन कमी होण्याची भीतीने, पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी कर्नाटक राज्याला वाढीव पाणी न देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शंभूराजे देसाई म्हणालेत की, “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलशयामध्ये आज तारखेला यंदाच्या वर्षी व गतवर्षी असणाऱ्या पाणीसाठ्यासंदर्भातील सविस्तर माहिती आपणांस देत असून उपरोक्त विषयानुसार कोयना धरणातील यंदाच्या वर्षीच्या पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती पाहता कोयना धरणातील पाणी यंदाच्या पावसाळ्यापर्यंत इतर राज्यांना न देता महाराष्ट्र राज्यकरताच राखीव ठेवणेविषयी आपणांस विनंती आहे.”
पुढे तव म्हणाले आहेत की, “वरीलप्रमाणे कोयना धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती असून कर्नाटक राज्याच्या मागणीनुसार त्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये आवश्यक असणारे पाणी यापूर्वीच देण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरू होण्याकरिता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत आहे.” मतदारसंघातील पाण्याच्या दुर्भिक्ष्याबद्दल ते म्हणाले की, “कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी पाटण तालुक्यातही यंदाच्या वर्षी पाणी टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागाकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.”
मुख्यमंत्र्यांनी सध्या दुष्काळ निवारणाच्या कामांकडे मंत्री व अधिकाऱ्यांना लक्ष द्यायला सांगितले आहे. पण शिवसेना आमदार शंभुराजेची मागणी पूर्ण करताना शेजारील कर्नाटक बरोबर कसलाही वाद होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहील.