आज ‘शहीद दिवस’ ! जाणून घ्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या विषयी
२३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. त्यामुळे आजचा दिवस ‘शहिद दिवस’ म्हणून ओळखला जातो. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे २३ वर्षांचे आणि राजगुरू २२ वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.
भगतसिंग:
भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ या दिवशी बंगा येथे झाला. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांना सुखदेव व राजगुरू यांची सोबत मिळाली. अनेक धाडसी कामात ते सक्रिय होते. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. भगतसिंग यांनी केलेल्या हत्येमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना लाहोर येथील कारागृहात फाशी देण्यात आली.
राजगुरु:
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साँडर्स वर गोळी झाडली यात त्याला मरण आले होते. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सुखदेव:
सुखदेव थापर यांचा जन्म १५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या हत्येच्या कटामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना भगतसिंग व राजगुरू यांच्यासोबत अटक झाली होती. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव यांनादेखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी देण्यात आली.