स्व. राजीव गांधीबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही : राज ठाकरे
मुंबई: निवडणुकीचा हंगाम जवळपास संपत आलाय. पण या दरम्यान होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनी नीचांकी पातळी गाठलीय असे म्हणायला हरकत नाही. एका बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानांचा उल्लेख सातत्याने चौकीदार चोर असा करत आहेत. तर त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवार(दि.४) रोजी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर टीका करताना, “भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधी यांचा जीवनप्रवास संपला” असे भाष्य केले होते. यावर काँग्रेस ने तात्काळ निषेध नोंदवाला. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींना म्हणाले की, “आता लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुम्ही तुमच्या स्वतःबद्दलची धारणा माझ्या वडिलांवर लादत असाल तरी तुम्ही वाचू शकणार नाही.”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटर वरून या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, “आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधिशून्यतेची. स्व. राजीव गांधीबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.”
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.#RajivGandhi
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2019