“बँकांनी संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळवावी” – रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन
अलिबाग, दि. १९: जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर झाला आहे.आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आचारसंहितेच्या कालावधीत होणाऱ्या संशयास्पद बँक व्यवहारांवर बँकांनी लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी जावळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जि.प.मुख्य लेखाधिकारी राहुल कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी देविदास टोंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जावळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत पैशाच्या गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि निपक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही पावले उचललेली आहे. यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशाची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँका माहिती घेतील. तसेच वॉलेटद्वारे पेमेंटमध्ये अधिक मागणी असल्यास NPCI त्यावर लक्ष ठेवेल. वॉलेटच्या सर्व व्यवहारावर लक्ष आहे. बँका दररोज संशयास्पद व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमांच्या संशयास्पद व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. यासाठी बँकांनी आपापल्या बँकेच्या पातळीवर समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत आणि या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून, याबाबतची माहिती अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी. राहुल कदम यांनी बँकानी याकाळात करावयाच्या कार्यवाही संदर्भात सादरीकरण केले.