राहुल गांधींनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा धक्कादायक सल्ला दिला होता : राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज, पहिल्यांदाच त्यांनी आपले म्हणणे पत्रकारांसमोर मांडले. आज लोणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
अहमदनगरच्या जागेबाबत राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर त्यांनी मला सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादीकडून लढा हे राहुल गांधींनी सांगणे धक्कादायक होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
राहुल गांधींनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर आता मनमोकळे पणाने मी बोलू शकतो, असे विखे पाटील म्हणाले. गेली साडेचार वर्षे विरोधीपक्ष नेतेपद सांभाळण्याचं फलीत काय तर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला मिळणं जे दुर्देवी होतं, असंही ते यावेळी म्हणाले.
नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनदा पराभूत झाला होता, म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी आमची मागणी होती. निवडून येण्याची क्षमता असल्याने डॉ. सुजय विखेंना उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचवेळी पत्रकार परिषद घेतली आणि आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर डॉ. सुजय विखेंनी भाजपात जाण्याची घोषणा केली. दरम्यान, मुलानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने आपण विरोधीपक्ष नेतेपदावर रहायचे नाही असं मी ठरवंल होतं. त्याचबरोबर आमच्या वडिलांचा अपमान झाल्याने मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असंही जाहीर केलं. मात्र राजकीय भूमिकेबद्दल योग्य निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतील, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आज गेल्या काही दिवसांत ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या, त्याचा खुलासा केला.