“नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी असून कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही”- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
कोलकाता: नागरिकत्व सुधारणा कायद्या संदर्भात उद्भवलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्याक वर्गाचा छळ होत असल्याची बाब सामोर आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधल्या बेलूर मठात आयोजित समारंभात ते बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन त्यांनी केलं. या कायद्याबाबत युवा वर्गाची दिशाभूल केली जात आहे. मात्र कोणाचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, तर नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे.
ईशान्य भारतावर या कायद्यामुळे कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वामी विवेकानंदांचं नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी युवावर्गानं सहकार्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. स्वामी विवेकानंदांची जयंती काल देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली गेली.
कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी कोलकाता बंदराचं ‘श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट’ असं नामकरण झाल्याची घोषणा केली. यानिमित्तानं सहाशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्धाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं.
तसंच बंदराजवळच्या शहरांमधे जलधारित पर्यटनासाठी नवीन मूलभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.
Credit – AIR