केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी, दि.२८: केंद्र सरकारचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच मोठं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रत्नागिरीत ही माहिती दिली. राणे यांची दोन दिवसांपूर्वी स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा आज सुरू झाली. त्यादरम्यान घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
या प्रशिक्षण केंद्रात उद्योगांविषयीची सर्व प्रकारची माहिती, यंत्रसामुग्री, कर्जपुरवठा इत्यादी विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल. दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल, असं त्यांनी सांगितलं.
कोकणातले नारळ, आंबा, काजू, फणस, कोकम इत्यादी फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग कोकणात सुरू व्हावेत, ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलेल्या कामांची माहिती लोकांना द्यावी आणि लोकांच्या समस्यांची माहिती प्रधानमंत्र्यांनी सादर करावी असा जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं.
देशातले ८० टक्क्यांहून अधिक उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. ३५ टक्क्यापासून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देणाऱ्या तसंच एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणाऱ्या योजना या मंत्रालयातर्फे राबवल्या जातात. त्यांचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोकणात जिल्हापरिषदा, नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात कोणत्याही पक्षाशी युती झाली, तर भाजपानेतृत्व जी भूमिका घेईल, ती मान्य करु असं ते म्हणाले.
Source – AIR