“ही एकप्रकारे ‘हत्या’च आहे..” – शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची सरकारवर टीका
नांदेड, दि. ३: नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता ३१ वर पोचला आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे की, रुग्णालयातले अत्यावस्थ रुग्ण तज्ञांच्या देखरेखीखाली असून त्यांना सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. जिल्हा आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या अत्यावस्थ रुग्णांची संख्या एकदम वाढल्यानं हे मृत्यू झाल्याचं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, विष्णुपूरीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ हे रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “ऑगस्टमध्ये ठाणे येथे त्यानंतर आता नांदेड आणि संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांअभावी अत्यवस्थ रुग्णांचे मृत्यू झाले. ह्या घटनेची जबाबदारी कोण घेणार? ही एकप्रकारे ‘हत्या’च आहे. केंद्र सरकार ह्याबाबत काय कारवाई करणार? चौकशी करणार का? राजीनामा घेणार का?” ही घटना दुर्देवी असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं आहे. नांदेड आणि संभाजी नगर रुग्णालयातील मृत्यू ही सरकारी हत्या असून कलम ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.