कालच्या घनघोर पर्जन्यवृष्टीनंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येतेय; अनेक ठिकाणी दुचाकींचा खच
मुंबई दि.६: काल मुंबईत झालेल्या घनघोर पर्जन्यवृष्टीतून अद्याप मुंबई सवरलेली दिसत नाही. जागोजागी झाडं, पोल, होर्डिंग्ज कोसळली असून मुंबई महानगरपालिकेकडून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. अनेक ठिकाणी दूर-दूर वरून वाहत आलेल्या दुचाकींचा खच पडला असून आपापल्या गाड्या त्यातून शोधण्यासाठी नागरिकांना कष्ट घ्यावे लागत आहेत.
कालच्या वादळी पावसाने नवा विक्रम प्रस्थापित करत दक्षिण मुंबईकरांनाही चकित करून टाकले. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही म्हणाले की पहिल्यांदा दक्षिण मुंबईत पाणी साचलेलं आपण पाहिलं. कालच्या पावसात अगदी मुंबई शेअर बाजार च्या इमारतीवरचा बोर्डही निखळून पडला इतका वाऱ्याचा जोर होता. पश्चिम उपनगरातही पावसाने असाच मोठा कहर केला. कांदिवली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक अद्यापही मंद गतीने चालू आहे. कालच्या या पावसाचा महाराष्ट्र वार्ता च्या वृत्त प्रसारणावरही मोठा परिणाम झाला असून इंटरनेट सेवा पूर्ववत व्हायला आणखी दोन दिवस लागणार असल्याने आम्हाला बातम्या प्रसारित करण्यास अडचण येत आहे. हवामान खात्याने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.