परतीचा पाऊस १४ ऑक्टोबपर्यंत कोसळण्याची शक्यता
हवामान विशेष : परतीच्या पावसाच्या जोरदार सरी राज्यात विविध ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत. मुंबईत काल रात्री तसंच आत्ता दुपारी मेघगर्जनेसह पाऊस येत आहे.
रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसानं अनेक ठिकाणी कापलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी काढणीस आलेल्या पिकाची काढणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
परतीचा पाऊस १४ ऑक्टोबपर्यंत कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पाली तालुक्यातील चिंबाडे घोटवडे येथे वीज पडून भागू दगडू झोरे यांची म्हैस आणि रेडा ठार झाले. तर वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसानं समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत.
गेल्या २-३ दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. सोयाबीन, ऊस, खरीप पिकांसह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे.मिरज तालुक्यातील दुधगांव परिसरात २००हून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं.अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.