मनसेला सोडचिठ्ठी दिल्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले स्पष्टीकरण
पुणे, दि.१५: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अपेक्षेप्रमाणे आज पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्याच्या सुरुवातीलाच पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. रूपाली पाटील या गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत राजकारणामुळे दुखावल्या गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पक्षाला राम-राम केला. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी राज ठाकरेंना पाहून राजकारणात आले, मला राजकीय वारसा नाही. लग्नाच्या आधीसुद्धा पक्षासाठी जेलमध्ये जाऊन आले, गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी काम केलं. माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंना वाईट बोलणार नाही, पण जी काही माझी खदखद आहे, ती व्यक्त केली आहे. मनसेमध्ये निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. बहीण म्हणून या परिवारात मी सोबत असेन. पण काही कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला. लोकांना न्याय देण्यासाठी खंबीर साथीची गरज असते, ते राज साहेबांना कळवलं आहे. त्यासाठी मी राजसाहेबांना वाईट बोलेन अशी मी स्वार्थी नाही, परंतु माझ्या कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे, बदल कोणाच्यात घडत नसेल तर मला स्वत:च्यात बदल करावा लागेल, राज ठाकरे माझे दैवत आहेत, आणि राहतील”
या शिवाय आपल्या पत्रात त्या म्हणतात की,
आदरणीय राजसाहेब ठाकरे
अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दिनांक : १४.१२.२०२१सप्रेम जय महाराष्ट्र,
मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद व मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल.
जय महाराष्ट्र
आपली कार्यकर्ती
सौ.रुपाली पाटील ठोंबरे