‘देशात शिवाजी महाराज, प्रभू राम, सरदार पटेलांचे पुतळे उभारले जातात, मग माझ्याच पुतळ्यावर विरोध का?’
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी स्वत:च्या पुतळ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून उत्तर दिलं आहे.
अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्राचा २२१ फुटाचा पुतळा उभारण्यात येत आहे, त्यांच्या पुतळ्याला कोणीच विरोध करत नाही, मग तुम्हाला माझा पुतळा का नाही चालत? देशात अनेक माजी पंतप्रधानांचे पुतळे उभारण्यात आले आहेत त्यावेळी का कोणी विरोध नाही केला, असा सवाल मायावती यांनी केला आहे.
मायावतींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुतळे उभारणीच्या परंपरेचे स्मरण करुन दिले आहे. देशात मूर्ती आणि स्मारकं बनविण्याची परंपरा खूप आधीपासून आहे. मुंबईत शिवाजी महाराज, उत्तर प्रदेशात प्रभू राम, गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचे पुतळे चालतात.काँग्रेसच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी सरकारी पैशातून जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे पुतळे उभारले होते. या पुतळ्यांबाबत प्रसारमाध्यमांनी किंवा याचिकाकर्त्यांनी कधीच कोणते प्रश्न का उपस्थित केले नाहीत? असा सवालही मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. वकील शैल द्विवेदी यांच्यामार्फत मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली.
सरकारी पैसा शिक्षण, रुग्णालये आणि पुतळे बनविण्यासाठी खर्च करावा की नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही. लोकांना आम्ही प्रेरणा देतो म्हणून लोक आमची स्मारकं बनवतो. लोकांची मागणी होती म्हणून पुतळे उभारण्यात आले.
माझे पुतळे उभारणे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा होती. त्याचबरोबर बसपाचे संस्थापक काशीराम यांचीही इच्छा होती. दलितांच्या सेवेसाठी मी आता पर्यंत केलेल्या कामाची, योगदानाची दखल घेऊन हे पुतळे उभारण्यात आले आहेत. अशात पैसे परत करण्याचा प्रश्न कुठेच येत नाही असे मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.