“ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी” – मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
सातारा, दि. १९ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात १५ मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, विपणन व निरीक्षण निदेशनालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला (भा.प्र.से) यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, ब्रँड धारक, ॲग्री स्टार्टअप उत्पादकांना आवाहन केले की ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण उत्पादनांचा पुरवठा करणे ही मुख्यत्वे आपली जबाबदारी आहे व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी एगमार्क कार्यप्रणाली सेंद्रिय प्रमाणिकरण कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केले.
महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी महाबळेश्वर येथील मध उत्पादकांसाठी हे प्रदर्शन व चर्चासत्र उपयुक्त असल्याचे सांगितले. भावेश कुमार जोशी, उप कृषी विपणन सल्लागार, भारत सरकार, मुंबई यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. राघवेंद्र मुरगोड सिनियर विपणन अधिकारी यांनी एगमार्क लायसन्स प्रक्रिया सुलभ पद्धतीने सांगितली. मधा संचालनालयाचे संचालक विजय पाटील यांनी मध संचालनालयाचे उपक्रम याची माहिती दिली. मध तूप इत्यादी अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी याबाबतचे प्रात्यक्षिक ही मुंबई येथील एगमार्क कार्यशाळेने उपस्थितांना यावेळी दाखवले. मधमाशांच्या वसाहती, मधमाशा हाताळण्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. मधमाशांचे विष संकलन कीट, एका वेळी १०० राणी माशा तयार करायची किट या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरले. आर. पी. नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय मेहरा यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील महिला नागरिक व मधपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.