सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांवर १.५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
पनवेल : येथील पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल महानगरपालिकेवर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानुसार कामोठे येथील ‘एमजीएम’ रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कोविड-१९ रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या बिलाची रक्कम मिळणार असूनही पनवेल महानगरपालिकेने १८ जून २०२० आणि २० जुलै २०२० रोजी अनुक्रमे ६६ लाख १६ हजार ५०० व ८४ लाख २४ हजार १६७ रुपयांची बिलं चुकती केली. ते पुढे म्हणाले की, “राज्यशासनातील दोन अस्थापनांतील समन्वयाचा अभाव यातून दिसून येत असून पनवेल महापालिकेने कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता एमजीएम रुग्णालयाला जवळपास १ कोटी ५० लाख ४० हजार ६६७ रुपयांचे बिल देऊन कोविड-१९ च्या नावाने मोठा भ्रष्टाचार केला आहे.”
कडू यांनी पनवेल संघर्ष समितीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास व नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची पत्रामार्फत मागणी केली आहे. गेल्या काहीं दिवसांपासून पनवेल महानगरपालीका या न त्या कारणाने चर्चेत आहे. कधी कोविड सेंटर मधील बलात्कार प्रकरणामुळे तर कधी लॉकडाऊन बाबत घेण्यात येणाऱ्या अजब निर्णयांमुळे पालिकेच्या कारभाराची लक्त्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. पण कांतीलाल कडू यांच्या ताज्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
सध्या पनवेल महानगरपालिकेत भाजप सत्तेत आहे तर शेतकरी कामगार पक्ष विरोधी बाकांवर आहे. गतवर्षी झालेली विधानसभा निवडणुक कांतीलाल कडू यांनी अपक्ष लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला पण गेल्या काही महिन्यांपासून कडू पुन्हा ऍक्शन मध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. सध्यातरी राज्यात भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पण पनवेल मधली स्थिती काहीशी निराळी दिसतेय. येथे विरोधीपक्ष म्हणून शेकाप व शिवसेनेची जागा कांतीलाल कडू यांच्या सारख्या विधानसभेत दारुण पराभव पाहिलेल्या उमेदवाराने सक्षमपणे घेणे ही या दोन्ही पक्षांसाठी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच धोक्याची घंटा आहे.