‘… मग राज ठाकरेंच्या नावाने शिमगा का?’- जितेंद्र आव्हाड
मुंबई : सध्या राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जलोषात सुरु आहे. आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. “१९८० सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांचाच वारसा आज राज ठाकरे पुढे चालवत आहे. मग त्यांच्या नावाने शिमगा का करता?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विटरवर म्हणाले, १९८० सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांचाच वारसा आज राज ठाकरे पुढे चालवत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात एकही जागा लढवत नसल्याने, त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांसाठी ही खास माहिती…!, असं ट्विट करीत त्यावेळच्या मार्मिकमध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये वापरलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे राज्यात ९ ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी त्याची चुणूकही दाखवली. त्यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चाही झाली होती. दरम्यान, भाजपाकडून मनसेने आघाडीला साथ देण्यावरुन राज ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजप-शिवसेनेला १९८० सालच्या निवडणुकीची आठवत करून दिली.