“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे” – जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींवर टीका
सांगली: आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रादुर्भाव प्रश्नी देशातील जनतेशी संवाद साधताना २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. यानंतर देशभर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ATM बाहेर लांबच लांब रांगा तर किराणा दुकानांवर झुंबडच उडाली. यावर जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर कडक टीका केली.
वाचा नेमके ते काय म्हणाले
“जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशात लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही.
देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनावश्यक गोष्टींच्याबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वाच्य नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे.
परंतु, महाराष्ट्रातील जनतेने गोंधळून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे.”