प्रशासनाने घेतला मनोज जरांगे पाटलांचा धसका; जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद
जालना, दि. २६: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय मागं घेतला असून ते आज सकाळी आंतरवाली सराटी इथल्या उपोषण स्थळी पोहोचले.समाज बांधवानी गर्दी न करता घरी जावं,असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं. प्रशासनाच्या विनंतीचा मान राखून उपचार घेत असून लवकरच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं त्यांनी आंतरवाली सराटीत परतल्यावर माध्यमांना सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात आजच्या आज सगेसोयरे कलमाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करत येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जालना आणि बीड जिल्ह्यात तसंच छत्रपती संभाजीनगर शहरातल इंटरनेट सेवाही आज संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अंबड-रामसगाव बस आज सकाळी तीर्थपुरी इथं पेटवून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील संपूर्ण बस सेवा पहाटेपासून बंद ठेवल्याचं, विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितलं. बीड येथून छत्रपती संभाजीनगर, जालनाकडे जाणारी बस सेवा आज सकाळपासून बंद केल्याची माहिती बीड इथले राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.