मुलांच्या मदतीला धावून आला भोलानाथ; अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबई: “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?” आज चक्क भोलानाथ शाळकरी मुलांच्या मदतीला धावून आला आहे. सोमवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अखेर राज्य सरकारने आज २ जुलै रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व उर्वरित कोकण विभागातील सर्व सरकारी व खाजगी शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने हा आदेश काढला आहे. हवामान खात्यानेही मुंबई शहर आणि उपनगराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरज नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटी आणि वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा पूर्ण खंडित आहे. त्यामुळे बऱ्याच अस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. त्याचवेळी ट्रान्स हार्बर वरील वाहतूक उशिराने व अतिशय मंद गतीने चालू आहे. पश्चिम रेल्वेही आज उशिराने चालू आहे.