“गोव्यातील सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभे आहे”; संजय राऊत
मुंबई: काल राज्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत येत्या काळातल्या आक्रमकतेची झलक साऱ्यांना दाखवली. आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यातल्या राजकीय पटलाबाबत एक मोठं भाष्य केलं.
ते म्हणाले की, “गोव्यामध्ये लवकरच भूकंप होईल. विजय सरदेसाई त्यांच्या सर्व आमदारांसह इथे हजर आहेत.” सरकारला पाठिंबा देणारे इतर काही आमदरही आमच्या संपर्कात असल्याचं यावेळी राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी सांगितले की त्यांचे सुदीन ढवळीकरांशीही बोलणे झाले आहे. ‘गोव्यातील सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभे आहे. लवकरच गोव्यात फार मोठी हालचाल झालेली दिसेल.’ असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, “फक्त गोवाच नाही तर संपूर्ण देशात हालचाल झालेली दिसेल आणि बिगरभाजप एक आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.गोव्यात नवीन फ्रंट तयार होत आहे. प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात आमच्याकडे बोटं दाखवतात की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेलो, पण गोव्यात ज्यापद्धतीने हे सरकार बनवण्यात आलं आहे, भ्रष्टचाराचे आरोप असलेल्या लोकांसोबत सरकार बनवले आहे, ते गोव्याच्या लोकांना बिलकूल आवडलेले नाही. यामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आज शिवसेनेसोबत आले आहेत. आम्ही त्यांच्यासोबत जाऊन एक फ्रंट तयार करत आहोत आणि लवकरच गोव्यातही एक चमत्कार पाहायला मिळेल.”
राऊत यांच्या या विधानानंतर एकच राजकीय खळबळ उडाली.