वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन
नागपूर: विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या नागपूर इथं काल ते बोलत होते. वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद, वैद्यकीय उपकरणं, लाकडाचा लगदा अशा प्रकारचा कच्चा माल आपल्याला परदेशातून आयात करावा लागतो. अशा कच्च्या मालाचा पुरवठा देशातूनच व्हावा, यासाठी संशोधन संस्थांनी संबंधित संस्थांच्या सहकार्य आणि समन्वयानं योग्य तंत्रज्ञान विकसित करायला हवं असंही गडकरी म्हणाले.
त्यामुळे आजवर मागास राहिलेल्या ग्रामीण भागांमध्ये उद्योगधंदे वाढू लागतील असं ते म्हणाले. विश्वेश्वरैय्या संस्थेत तंत्रज्ञान विकास आणि गुणवत्ता केंद्राची स्थापना करण्यासाठी २०० कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य देऊ, अशी घोषणाही गडकरी यांनी केली.