कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. या भागातील जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, जगन्नाथ शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, नगरविकास (२) विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराज यांच्यासह संतोष केणे, गोपाळ लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, संघर्ष समितीचे गुलाब वझे, यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि संघर्ष समिती व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, जनभावना समजून घेण्याकरिता आज बैठक घेतली आहे. २७ गावातील नागरिकांना महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका हवी आहे तर काहींना ही गावे महापालिकेत समाविष्ट रहावी, असे वाटते. दोन्ही बाजूंना न्याय मिळावा, या भूमिकेतून आपण पुढे जाऊया, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर या भागात विकास झाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. असे स्पष्ट करताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी भूमिपुत्रांच्या बाजूने असून त्यांना मूलभूत सुविधादेखील मिळाल्या पाहिजेत. शासन ग्रामस्थांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आज संघर्ष समिती आणि युवा मोर्चा तसेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करु. त्यानंतर या प्रकरणी जलद गतीने सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.