उल्लेखनीय! द्रोणागिरी किल्ल्यावर वृक्षारोपण करुन शिवजयंती साजरी
उरण दि.२०(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या द्रोणागिरी किल्ला परिसरात वृक्षारोपण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे आणि उरण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या नवपरिवर्तन संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त वृक्षारोपण करून, दुर्ग संवर्धनाप्रमाणेच निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
नवपरिवर्तन संस्था तालुक्यामध्ये करीत असलेले सामाजिक कार्य आणि संस्थेचे द्रोणागिरी किल्ला संवर्धनाचे कार्य पाहून, शिवजयंती निमित्त नवपरिवर्तन संस्थेला शंभर करंजाची रोपं द्रोणागिरी किल्ला परिसरामध्ये लावण्यासाठी नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परिक्षीत ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीमधे किरण मढवी यांनी सुपूर्द केली. ही झाडे टप्प्या-टप्प्याने लावुन त्यांचे योग्य संवर्धन केले जाईल अशी नवपरिवर्तन संस्थेने ग्वाही दिली.
तत्पुर्वी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे प्रतीक असणाऱ्या वटवृक्षाचे रोपण दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी किल्यावर करुन शिवजयंती साजरी केली. यावेळी उपस्थित असणारे नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परीक्षित ठाकूर यांनी दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्यात यापुढे सहभागी होऊन सहकार्य करण्याचे मत व्यक्त केले आहे. तर नवपरिवर्तन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सत्या ठाकरे यांनी निसर्गाचा समतोल राखून आपले जीवन अधिक सुखकर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आपल्या मनोगतातुन सर्वांना नम्र आवाहन करुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.