राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोप्प नाही – धनंजय मुंडे
बीड: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामधील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा रंगलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, एवढं ध्यानात ठेवा, असे म्हणत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ह्या भाजप सरकारला आपण गल्ली पासून तर थेट दिल्लीपर्यंत सत्ता दिली, यांनी केले तरी काय?
रेल्वेचे डबे बनवणारा कारखाना लातूरला गेला, ऊसतोड कामगारांना देशोधडीला लावलं, त्यांचे घर संसार उध्वस्त केले. राज्यातील लोकांचे हाल बघून आमच्यासारख्या फाटक्या व्यक्तीने पण थोडाफार स्वाभिमान जपला असता आणि या सरकारला लोकांपेक्षा राज्यघटनेत बदल करणे महत्त्वाचे वाटत आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे व भाजप वर जोरदार टीका केली.
काही दिवसांपूवी पंकजा मुंडे प्रचारसभेतील भाषणात बोलताना राज्यघटना बदलू असं बोलून गेल्या होत्या. मात्र, लगेच आपली चूक सुधारत पंकजा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली, संविधान दिले. त्यामुळेच, आपण इथपर्यंत पोहोचल्याचं म्हटले होते. दरम्यान, धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्या त्या विधानाचा आधार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यघटना बदलणे हे चिक्की खाण्याइतकं सोपं नसल्याचंही ते म्हणाले.