नियमबाह्य पद्धतीने सभागृह चालविण्याचा आणि दडपशाहीचा मी निषेध करतो; देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई: विधिमंडळात आज महा विकासआघाडीने आपले बहुमत सिद्ध केले. यावेळी भाजप ने सभात्याग केला.
सभात्याग करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या आघाडीवर कठोर टीका केली. ते म्हणाले की, “नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीने बोलाविण्यात आलेल्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनाविरुद्ध आज सभागृहात आक्षेप मांडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारने केली.
२७ नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झाले, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झाले आणि राष्ट्रगीताने सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झाले होते. नव्याने अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री १ वाजता हे कळविण्यात येते. यामागे नेमका उद्देश काय?
नूतन अध्यक्षांची निवड होईस्तोवर हंगामी अध्यक्ष हे कायम राहत असतात. पण या सरकारने त्यातही बदल केला. नवीन हंगामी अध्यक्ष आणले गेले. देशाच्या इतिहासात असे आजवर कधी घडले नाही. संविधानाची पूर्णतः पायमल्ली येथेही करण्यात आली.
अध्यक्षांची निवड झाल्याशिवाय विश्वासमत कधीही मांडण्यात आलेले नाही. हा पराक्रम सुद्धा या सरकारने केला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले. नियमबाह्य पद्धतीने सभागृह चालविण्याचा आणि दडपशाहीचा मी निषेध करतो.”