“राज्यात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ५२ वर, परंतू ५ रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर”
राज्यात आज ३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री म्हणाले की, “कोरोना बाधित जे रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते त्यातील काही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ५ रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. याचा अर्थ रुग्ण बरा होतो.त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये..पण काळजी घ्यावी.” महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत अतिदक्षतेचा कोरोना बाधित रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे त्यांनी यावेळी विशेष नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, “कोरोना पार्श्वभूमीवर आतापर्यंत जी लक्षण आढळलेली प्रवासी ९७१ होते. एकूण १०३६ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आता आपण ६ लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या १२ होईल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संबंध देशाला केलेल्या आवाहनाबाबत ते म्हणाले की, “कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने १००% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.”