अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा हवालदिल; जाणून घ्या हवामानाची सद्यस्थिती
मुंबई, दि. ७: राज्यात अनेक जिल्ह्यात बेमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात कालपासून ढगाळ वातावरण असून रात्री काही भागात हलका पाऊस पडल्याचं वृत्त आहे. नंदूरबार जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात मंगरूळपीर, मालेगाव, कारंजा तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण असून आज पहाटेच्या सुमारास विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोलीत सेनगाव तालुक्यातल्या पानकनेरगाव येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातही आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते आणि सकाळी सहापासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम विदर्भातही आज पहाटेपासूनच अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचं नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात कापणीला आलेल्या गहू, हरभरा, मका या पिकांचं तसंच केळी, पपई फळबागांचं नुकसान झालं. हिंगोलीतही गहू, हरभरा, ज्वारी आणि आंबा, संत्री, मोसंबीच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काल टिटाने खोरी या गावात जोरदार गारपीट झाल्याने कांदा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार मंजुळाताई गावित, खासदार सुभाष भामरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील आणि राज्य सरकार योग्य ती मदत शेतकऱ्यांना देईल, असं महाजन यांनी सांगितलं.
वाशिम जिल्ह्यातली संत्रा नगरी म्हणुन ओळख असलेल्या मुंगळा येथे काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गावातल्या शेकडो हेक्टरवरच्या संत्रा बागांचे नुकसान झाले. सध्या संत्र्याचा तोडणीचा काळ असून संत्र्याला चांगला भाव आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.