
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सोलापूर, दि. १: केंद्र शासनाच्या नीति आयोग कडून ४ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी देशाच्या दुर्गम भागात असलेल्या ११२ आकांक्षीत जिल्हा व ५०० आकांक्षीत तालुक्यामध्ये ‘संपूर्णता अभियान’ ही तीन महिन्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सांगोला व अक्कलकोट तालुक्याचा समावेश असल्याने केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, सोलापूर, जिल्हा आर्थिक विकास महामंडळ आणि श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी कांतामाती श्री विजयसिंह राजे भोसले मंगल कार्यालय, मैंदर्गी रोड, अक्कलकोट येथे संपूर्णता अभियाना वर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर महिला कार्यकर्त्या शांभवी कल्याणशेट्टी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे, अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाकडे, श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष सुलोचनी गवी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, कृषी अधिकारी सचिन चव्हाण आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षम व्हावे. भारताला महासत्ता बनण्यासाठी महिलांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत शांभवी कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार जोशी यांनी महिला बचत गटात येणाऱ्या अडचणी व उपाययोजना या विषयावर सविस्तर माहिती दिली. अग्रणी बँक व्यवस्थापक वाकडे यांनी महिला आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकेतून अंकुश चव्हाण म्हणाले नीती आयोगाचे आरोग्य, पोषण, कृषी, सामाजिक विकास, या सहा निर्देशांकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये गर्भवती महिलांची प्रसुती पुर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, १० वी १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी हे दर्शके आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्राची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन विनोद राठोड यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, बांगड्या, खाद्यपदार्थ आदीचे उत्कृष्ट विक्री स्टॉल मांडलेल्या बचत गटांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, शील्ड देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे जे एम हन्नुरे, साईराज राऊळ आणि श्री स्वामी समर्थ लोकसंचालित साधन केंद्राच्या सह्योगीनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.