भारताच्या पहिल्या सौर मोहिमेतलं आदित्य एल 1 यान आज सूर्याजवळच्या L1 कक्षेत पोहोचलं
मुंबई, दि. ६: सूर्याच्या अभ्यासासाठी गेलेला आदित्य एल १ हे भारताचं यान आज दुपारी सूर्याजवळच्या L1 या अंतिम कक्षेत पोहोचलं आहे. हॅलो कक्षेत हे ठिकाण आहे. पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षातून इस्रोनं मोटार आणि इतर उपकरणांचं योग्य नियोजन करुन आदित्य L1 ला योग्य कक्षेत नेलं. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख दशलक्ष किलोमीटर अंतरावर ही कक्षा आहे. याठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण एकसमान असतं. भारताच्या पहिल्या सौर मोहिमेतलं हे यान या कक्षेत ५ वर्ष फिरण्याची शक्यता आहे.सुर्यग्रहणाच्या काळातही या कक्षेतून आदित्य एल-वनला सूर्याचा अभ्यास करता येईल. गेल्यावर्षी २ सप्टेंबरला या यानानं श्रीहरीकोटामधून उड्डाण केलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या यशाबद्दल इस्रोचं कौतुक केलं. यामुळं सुर्याविषयीच्या आपल्या ज्ञानात भर पडेल आणि मानवजातीला त्याचा फायदा होईल, असं त्या म्हणाल्या. देशातल्या शास्त्रज्ञांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवे उच्चांक गाठत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग,माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञांंचं अभिनंदन केलं आहे.
Source – AIR