युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार
मुंबई, दि. ३०: केंद्र सरकारने युरियावर ३ वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा मी नितांत आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ३.६८ लाख कोटींची युरिया सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर केल्यामुळे त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कर आणि नीमलेपनाचे शुल्क वगळून ४५ किलोच्या पिशवीला २४२ रुपये हाच दर कायम राहिल. हे अनुदान खरीप हंगाम २०२३-२४ साठी नुकत्याच मंजूर झालेल्या ३८,००० कोटी रुपयांच्या पोषण आधारित अनुदानाव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही आणि यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या, युरियाची एमआरपी प्रति ४५ किलो युरियाच्या पिशवीसाठी २४२ रुपये आहे (निमलेपणाचे शुल्क आणि लागू असलेले कर वगळून), तर पिशवीची वास्तविक किंमत सुमारे २२०० रुपये आहे. या योजनेसाठी पूर्णपणे केन्द्र सरकार वित्तपुरवठा करते. युरिया अनुदान योजना सुरू ठेवल्याने स्वयंपूर्णतेच्या दिशेने जात युरियाचे स्वदेशी उत्पादनही वाढेल.
ऊसाला मिळालेल्या एफआरपीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम २०२३-२४ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाला १०.२५%च्या मूलभूत वसुली दरासह ३१५ रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) देण्यास मंजुरी दिली आहे. वसुलीमध्ये १०.२५% पुढील प्रत्येक ०.१% वाढीला ३.०७ रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक ०.१% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात ३.०७ रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली ९.५% हून कमी असेल तेथे कोणतीही कपात करण्यात येणार नाही असा देखील निर्णय घेतला आहे.
युरियावर देण्यात आलेल्या सबसीडीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे, खतांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर अनेक पटींनी वाढत आहेत. परंतु मोदी सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून आपल्या शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीपासून वाचवले आहे. केंद्र सरकारने, शेतकऱ्यांचे हितरक्षण करत, खत अनुदान २०१४-१५ मधील ७३,०६७ कोटी रुपयांवरुन २०२२-२३ मध्ये २,५४,७९९ कोटी रुपये इतके वाढवले आहे.
२०२५-२६ पर्यंत, पारंपरिक युरियाच्या १९५ LMT च्या ४४ कोटी बाटल्यांची उत्पादन क्षमता असलेले आठ नॅनो युरिया संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहेत. नॅनो कण असलेली खते नियंत्रित रीतीने पोषक तत्त्वे बाहेर सोडणे, ज्यामुळे पोषक तत्त्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेत होतो आणि शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. नॅनो युरिया वापरल्याने पीक उत्पादनातही वाढ झालेली दिसून आली आहे.
कोटा राजस्थान,येथे चंबल फर्टीलायझर लिमिटेड, मॅटिक्स लि. पानगढ, पश्चिम बंगाल, रामागुंडम-तेलंगणा, गोरखपूर-उत्तरप्रदेश, सिंद्री-झारखंड आणि बरौनी-बिहार येथे झालेल्या, ६ युरिया उत्पादन युनिट्सची स्थापना आणि पुनरुज्जीवन यामुळे 2018 पासून युरिया उत्पादन आणि उपलब्धतेच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत होत आहे. २०१४-१५ मध्ये युरियाचे स्वदेशी उत्पादन २२५ LMT वरून २०२१-२२ मध्ये २५० LMT पर्यंत वाढले आहे. २०२२-२३ मध्ये उत्पादन क्षमता २८४ LMT इतकी वाढली आहे. हे नॅनो युरिया प्लांट्ससह युरियावरील आपले सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करतील आणि अखेर २०२५-२६ पर्यंत आपण स्वयंपूर्ण होऊ.
