नवी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘स्वराज्यापासून नव-भारतापर्यंतच्या भारताच्या संकल्पनांचा आढावा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१९: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘स्वराज्यपासून नव-भारतापर्यंतच्या भारताच्या संकल्पनांचा आढावा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या स्मरणार्थ विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे या तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर या उदघाटन सोहोळ्यात उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, विद्यापीठ आणि विद्यार्थी हे बदलाच्या कल्पना, धोरण आणि जाणिवेचे वाहक असू शकतात आणि जेव्हा युग बदलते तेव्हा विद्यापीठ नेहमीच त्या बदलाचे वाहक असते. ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेने शंभर वर्षांनंतरही तिची प्रासंगिकता राखणे ही मोठी कामगिरी आहे.

अमित शहा म्हणाले की, या चर्चासत्राचा विषय आहे ‘स्वराज्यापासून नव-भारतापर्यंतच्या भारताच्या संकल्पनांचा आढावा’ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा महत्वपूर्ण विषय हाताळताना दिल्ली विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत काळाची सुरुवात झाली पाहिजे आणि ७५ ते १०० वर्षांचा हा अमृत काळाचा प्रवास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मोदीजींनी या २५ वर्षांचे वर्णन संकल्पाच्या पूर्ततेची २५ वर्षे असे केले आहे.

